सर्वोच्च न्यायालयासंदर्भातील वक्तव्यावरून चित्रा वाघ यांनी साधला निशाणा
मुंबई ः प्रतिनिधी
दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झाले, अशी टीका अग्रलेखामधून शिवसेनेने केली आहे. हा न्यायालयाचा अपमान असून यामुळे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडतेय, असे दिसते, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्याच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावरून राऊत यांना फटकारल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. मात्र आता या प्रकरणावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी, राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला लगावला. भाजपच्यावतीने त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना राऊत यांच्यावर सडकून टीका केली.
परमबीर सिंग प्रकरणातील याचिका सीबीआयकडे वर्ग करण्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने राऊत यांना फटकारलं होतं. मात्र आता यावरुन शिवसेनेने, न्यायाचा तराजू हलतो आहे व सत्याची गळचेपी सुरू आहे. अशा वेळेला न्यायालयांनी जनतेचा आवाज बनायला हवे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावे लागेल. एका विशिष्ट विचारधारेच्या परिवाराचा ‘गुलाम’ किंवा ‘प्रचारक’ म्हणून केंद्रीय तपास यंत्रणा व न्यायालयास स्वतःला जुंपून घेता येणार नाही. भारतीय घटना त्यांना तशी मान्यता देत नाही, पण आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आळवीत आहेत, अशा कठोर शब्दांमध्ये टीका केली.
याच टीकेच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी, केंद्र सरकारच्या हातात असलेला न्यायाचा तराजू म्हणजे चोर बाजारातून विकत आणल्याचे वक्तव्य शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत यांनी केले. हे वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. या वक्तव्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मी मागणी करते, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.