Breaking News

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. 2) दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.
या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सुनील तटकरे, सदाशिव लोखंडे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, बच्चू कडू, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राम शिंदे, सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त राजेंद्र भोसले, कोकण विभागीय परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील पवार, नितीन पावले तसेच इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्र निर्माणाचे व्हिजन दिले. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. जलदुर्गांची निर्मिती केली. आजही जलदुर्ग अढळपणे टिकून आहेत. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब ’एक भारत-श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेत पाहायला मिळते. महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अभूतपूर्व आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्भूत होते. त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही कारभार करतोय. राज्य सरकारने शेतकर्‍यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे हे शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही शिवरायांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनामनात पोहचवण्याचा संकल्प आपण केला आहे. या पुढील काळात किल्ले रायगडावर साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंब तलवार देशात आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. महाराजांच्या जीवनावरील गॅझेटीयर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. याशिवाय ंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी पाच कोटी रुपये दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श जगभरातील लोकशाही मानणार्‍या देशांनी घेतला आहे.
शिवराज्याभिषेक सुरू असताना अवकाशात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच पोलीस मानवंदनादेखील प्रथमच देण्यात आली.

रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे होते. त्यांनी जातीभेद केला नाही. महाराज त्यांच्या राज्य कारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते. जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. त्यांनी महिलांनाही पुढे येण्याची संधी दिली. महाराजांची शिकवण डोळ्यांसमोर ठेवून कारभार करतोय याचा आम्हाला अभिमान आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवी दिल्लीत छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी करणार -उपमुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली, गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply