मुंबई ः प्रतिनिधी
पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिसेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी पोर्टल सुरू करून याबाबतची ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून, त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही सुविधा सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे.
पेन्शनर्सने एखाद्या सायबर कॅफेमधून पोर्टलवर क्लिक करून अंगठ्याचा ठसा, आधार क्रमांक आणि बँकेचा अकाऊंट क्रमांक दिल्यानंतर त्यांच्या रजिस्टर क्रमांकावर ‘ओटीपी’ पाठविला जाईल आणि बँकेला काही सेकंदातच जीवन प्रमाणपत्र सादर होईल. त्यानंतर पेन्शनर्सचे अकाऊंट अपडेट होणार आहे. ही प्रक्रिया पेन्शनर्सला दरवर्षी करावी लागणार आहे. ही सुविधा सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी सुरू केली आहे. याकरिता प्रत्येक बँकेने केंद्रीय पेन्शन प्रोसेस सेंटर (सीपीपीसी) सुरू केले आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने देशभरात 16 ‘सीपीपीसी’ सुरू केले आहेत. त्यात अकोल्याचादेखील समावेश आहे. ‘एसबीआय’सोबतच सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडियासह जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ही सुविधा सुरू होत आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या पोर्टलवर पेन्शनर्सला बँकेत न येता थेट विदेशातूनही लिंक करता येणार आहे. या प्रक्रियेला ई-केवायसी असे नाव दिले आहे. पेन्शनर्सला ही प्रक्रिया नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पूर्ण करायची आहे. न केल्यास जानेवारीत पेन्शन बंद होणार आहे. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पेन्शनर्सला ओटीपी आल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाली असे समजायचे.