अलिबाग ः प्रतिनिधी
आदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेताना आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन समन्वयाने काम करावे, मात्र सुनील तटकरे यांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असा सल्ला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबागेत पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
खासदार सुनील तटकरे जिल्ह्यात राज्य सरकारमार्फत होणार्या कामांत ढवळाढवळ करीत आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, अशी भूमिकाही आमदार महेंद्र दळवी यांनी मांडली.
आमदार दळवी यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या दोन पक्षांत धुसफूस असल्याचे स्पष्ट होत आहे. अलिबाग तालुका हा एमएमआरडीए क्षेत्रात येतो. त्या माध्यमातून तालुक्याचा विकास कारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रेवस करंजा पूल व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असून यासंदर्भात आपण एमएमआरडीएच्या अधिकार्यांची नुकतीच बैठक घेतली. अलिबाग व मुरूड हे दोन तालुके पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पर्यटन वृद्धी व पर्यटकांना सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही चर्चा झाल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper