Breaking News

यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे? आणि ते देशाने स्वीकारायचे का?

देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींना पत्रातून सवाल

मुंबई ः प्रतिनिधी
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले असून, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोनिया गांधींना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, अगदी 13 मे रोजीच्या आकडेवारीचा विचार केला तरी देशातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण 22 टक्के आहे, जे सातत्याने 30 टक्के व त्याहून अधिक राहिले आहे. देशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण 31 टक्के, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाणसुद्धा 14 टक्के आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. महाराष्ट्रातील स्थिती सुधारली तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल व देशातील कोरोनाविरुद्धचा लढा अधिक ताकदीने लढता येईल याच्याशी आपण सहमत असालच. आज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते, ज्यात 1.80 कोटी वॅक्सिन्स, आठ लाखांहून अधिक रेमडेसिवीर, 1750 मेट्रिक टन ऑक्सिजन, कितीतरी व्हेंटिलेटर्स, बायपॅप व ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर्सचा समावेश आहे. असे असले तरी काही लोकांना पंतप्रधान मोदींवर टीका करणे हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य वाटते.
राज्यातील सरकारला व काही माध्यमांना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असे वाटते. समजा मुंबईची स्थिती पाहिली तरी येथे चाचण्या कमी, त्यातही रॅपिड अँटीजेनचे प्रमाण अधिक ठेवून एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले. कोरोनामुळे होणारे मृत्यूही मोठ्या प्रमाणात लपविले जात आहेत. अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या वर्गवारीचे राज्यातील अन्य जिल्ह्यांचे प्रमाण 0.8 टक्के असताना एकट्या मुंबईत ते 40 टक्के आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी 88 हजार मृत्यू होतात, पण 2020 या वर्षात यात 20,719 मृत्यू वाढले. यातील 11,116 मृत्यू केवळ कोरोनाचे दाखविले. म्हणजे प्रत्यक्षात 9,603 कोरोना मृत्यू दडविले. गेल्या वर्षीचा हा क्रम या वर्षीही सुरूच आहे.
आता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? आजही अंत्यसंस्कारांसाठी वेटिंग पिरिएड आहे. देशात दररोज चार हजार मृत्यू कोरोनामुळे नोंदले जात असताना त्यातील 850 हे महाराष्ट्रातील आहेत आणि सरकार आपले कौतुक करण्यात व्यस्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यांसारख्या भागांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना देवाच्या आधारावर सोडून देण्यात आले आहे. ग्रामीण भागात बेड्स नाहीत, उपचार नाहीत, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष आहे. शेवटी विविध न्यायालयांना हस्तक्षेप करीत आदेश द्यावे लागले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आणि मृत्यूची स्थिती अतिशय वाईट आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजारीत सरकारी डॉक्टर पकडले जातात, तर त्यांचा पीसीआरसुद्धा मागितला जात नाही अशी स्थिती आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
कधी कधी लॉकडाऊन हा उपाय असतो, पण असे करताना गरीब, उपेक्षित, शेतकरी यांना पॅकेज देणे अपेक्षित असते. अनेक छोटी राज्ये मदत देत असताना महाराष्ट्रात मात्र अर्थसंकल्पीय आकड्यांची पॅकेजमध्ये बनवाबनवी करण्यात आली आहे. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी समाजमाध्यमांचे टेंडर जारी केले जातात, पण गरिबांना मदत मिळत नाही. असे असतानासुद्धा आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. संकटात सूचना करणे हे विरोधी पक्षाचे कामच असते, पण नकारात्मक वातावरणाची निर्मिती होणार नाही याचीही काळजी घेतली जाणे आवश्यक असते. केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेस किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यांनी चालणार्‍या सरकारांनासुद्धा सल्ला देणे हे कामदेखील आपण (सोनिया गांधी) केले पाहिजे, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.
आज संपूर्ण जग पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहत आहे. त्यामुळे जगातील अनेक देश मदत देण्यासाठी पुढे आले आहेत. भारतीय वॅक्सिनला नाकारणारा काँग्रेस पक्ष आज त्यावरच राजकारण करताना दिसून येतो. खरंतर वॅक्सिनचे उत्पादन वाढत आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात 200 कोटी वॅक्सिन उपलब्ध होणार आहेत. अर्थात भारतीय वॅक्सिनबाबत काँग्रेसचा विश्वास वाढतोय ही अतिशय आनंदाची बाब आहे. या संकटात केवळ राजकारण न करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवेल, असे म्हणत ‘ये पब्लिक है, सब जानती है,’ असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply