नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 27) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जे अभियान सुरू आहे, ते आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. आज एका अशा मिशनची सुरुवात होत आहे, ज्यामध्ये भारतातील आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची शक्ती आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मला आनंद होतोय की आजपासून आयुषमान भारत डिजिटल मिशन संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आले आहे. हे मिशन देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या उपचारांमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. पुढे बोलताना त्यांनी 130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाईल सबस्क्राईबर्स, जवळपास 80 कोटी इंटरनेट युजर्स, जवळपास 43 कोटी जनधन बँक खाती एवढे मोठे कनेक्टेड इन्फ्रास्ट्रक्चर जगात कुठेच नाहीये. हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर रेशनपासून प्रशासनापर्यंत, पारदर्शी पद्धतीने सामान्य भारतीयांपर्यंत पोहचवत आहे, असे सांगितले.
पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, कोरोना काळात टेलिमेडिसिनचाही अभूतपूर्व विस्तार झाला आहे. ई-संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास सव्वा कोटी रिमोट कन्सल्टेशन पूर्ण झाले आहे. ही सुविधा दररोज देशातील दूर-दूर राहणार्या हजारो देशवासीयांना घरबसल्या शहरांतील मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांशी कनेक्ट करणार आहे.
प्रत्येकाला हेल्थ आयडी मिळणार -पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वांना मोफत अभियानांतर्गत भारताने जवळपास 90 कोटी लसीचे डोस दिले आहेत. यामध्ये को-वीन अॅपची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन आता संपूर्ण देशातील रुग्णालयातील डिजिटल हेल्थ सोल्यूशन्सना एकमेकांशी कनेक्ट करेल. या अंतर्गत देशवासीयांना आता एक डिजिटल हेल्थ आयडी मिळणार आहे. प्रत्येक नागरिकांचे हेल्थ रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित असेल.
Check Also
रिटघर येथे लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवी वर्ष शुभचिंतन समारंभ उत्साहात
विद्यालयासाठी ४० लाखांची घोषणा पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, थोर देणगीदार, …
RamPrahar – The Panvel Daily Paper