राज्यभरातील ग्राहकांना दिलासा
मुंबई : प्रतिनिधी
राज्य वीज नियामक आयोगाने सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचे नियोजन केलं आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात 5 ते 7 टक्के, व्यावसायिक दरात 10 ते 12 टक्के आणि औद्योगिक दरात 10 ते 11 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. नवे दर 1 एप्रिलपासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.
वीज नियामक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईला वीजपुरवठा करणार्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करतील, तर उर्वरित महाराष्ट्रासाठीचे दर महावितरणकडून कमी केले जातील.
वीज बिल कमी करण्यासोबतच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग सध्या ठप्प असल्याने पुढील तीन महिने कंपन्यांकडून वीज बिल वसुली केली जाणार नाही. यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.