पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरी वाढला होता. आजतागायत 19769 नागरिकांना पनवेल ग्रामीण भागात कोरोनाची लागण झाली. यापैकी 217 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर 19164 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला केवळ 388 सक्रिय रुग्ण पूर्ण ग्रामीण भागात आहेत. 15 ऑगस्टपासून विविध निर्बंध हटल्याने अनलॉक सुरू झाले आहे. पनवेल परिसरातील 32 गावे कोरोनामुक्त झाली असली तरी अद्यापही काही गावांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आहे. माची प्रबळ, बेलवली, बोर्ले, वारदोली, पाले बुद्रुक, मोहपे, खानावळे, बारवाई, भेरले, आरीवली, आष्टे, शिवाजीनगर, दहिवली, मोहो, वडवली, कुडावे, सवणे, कालीवली, सारसई, बारापाडा, डोलघर, कोरळ, पोसरी, अंकुळवाडी, दापीवली, कराडे बुद्रुक, जाताडे, कासब, दिघाटी, किल्लावाडी, चिंचवन, चिरवत ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर उलवे, सुकापुर, नेरे, पळस्पे, शिरढोण, शिवकर, वावंजे विभाग, ओवळे, चिंचपाडा, डेरवली, शेडुंग, आदई या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे. ग्रामीण भागात दररोज 100 पेक्षा जास्त कोविड चाचण्या केल्या जात आहेत. सध्याच्या घडीला ग्रामीण भागात केवळ 388 सक्रिय रुग्ण आहेत. बरे होणार्या रुग्णांची टक्केवारी 97 टक्के आहे. तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी व्हावा या दृष्टीने विविध उपाययोजन राबविल्या जात असुन आरोग्य विभागाशीदेखील याबाबत समन्वय साधला जात असल्याचे नुकताच पनवेलच्या गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतलेले गटविकास अधिकारी संजय भोये यांनी सांगितले.