Breaking News

कर्जतच्या पोसरी-साळोख रस्त्याची दुरवस्था; वाहनचालक, प्रवासी त्रस्त

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील मुरबाड रस्त्यावरील आरवंद गावाकडे जाणार्‍या रस्त्याची पावसात दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून संबंधित अधिकार्‍यांनी या रस्त्याच्या कामाची दक्षता आणि गुण नियंत्रक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील वरई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दीपक धुळे यांनी केली आहे. कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पोसरी गावापासून आरवंद-साळोख गावाकडे जाणारा रस्ता खराब झाला होता. गेली अनेक वर्षे या रस्त्याची दुरावस्था झाल्याने स्थानिक या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी करीत होते. शेवटी या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनामधून करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 2022मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. मात्र या रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे झाले नाही, असा स्थानिक ग्रामस्थ दीपक धुळे यांचा आरोप आहे. हा रस्ता पावसाच्या पहिल्या महिन्यात खराब झाला आहे.लाखो रुपयांचा निधी खर्च होऊनदेखील काही महिन्यात रस्त्यावर खड्डे पडले असल्याने स्थानिकांनी कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याच्या कामाची शासनाच्या दक्षता आणि गुण नियंत्रक विभाग यांच्याकडून चौकशी व्हावी, अशी मागणी दीपक धुळे यांनी केली आहे.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply