Breaking News

खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देणार; मनसैनिकांची ग्वाही

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकही वाटा उचलणार असल्याची ग्वाही रविवारी (दि.5) उलवा नोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण व पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या संवाद मेळाव्यात मनसैनिकांनी दिली. या वेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी मार्गदर्शन करताना महायुतीचे उमेदवार बारणे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन केले.
या मेळाव्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, सचिव केसरीनाथ पाटील, अतुल चव्हाण, अविनाश पडवळ, उपाध्यक्ष दीपक कांबळी, प्रवीण दळवी, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष आदिती सोनार, उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, महानगरप्रमुख योगेश चिले, महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा वर्षा पाचभाई, उरण तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा अभिमान आणि स्वाभिमान आहेत. देशाचे सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या पंतप्रधान मोदींचे लोकहिताचे काम संपूर्ण जग पाहत आहे. सन 2014 साली त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची जबाबदारी हाती घेतली आणि संपूर्ण देशात परिवर्तनाची लाट आली. देशाने विकासाच्या बाबतीत आगेकूच करायला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर 2019मध्ये देशातील नागरिकांनी पुन्हा त्यांना कौल दिला आणि देश झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करू लागला. या सर्व घटना घडत असताना जगाने मोदीजींचे नेतृत्व मान्य केले. देशातील नागरिक पाठीशी खंबीर उभे राहत असताना जगानेही मोदींच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आणि आपल्या भारताचा गौरव जगाच्या कानाकोपर्‍यातून झाला. आजच्या घडीला आपल्याच देशाला नाही, तर संपूर्ण जगाला मोदीजींकडून खूप अपेक्षा आहेत त्यामुळे देशाचे हित कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणे ही काळाची आणि जगाची गरज आहे.
मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजेत असे जाहीर केले आणि संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. या अनुषंगाने राजसाहेबांनी दिशादर्शक पावले उचलली. त्यांच्या भूमिकेला मनसैनिकांनी नेहमीच पाठिंबा दिला व त्यांच्या आदेशाचे सदैव पालन केले याचा सर्व महाराष्ट्राला गर्व आहे. अडीच वर्षांपूर्वीचे राज्य सरकार फक्त फेसबुकवर चालत होते. त्यामुळे लोकांसाठी काम करणारे नेते आणि फेसबुकचे नेते लोकांना कळून चुकले आहेत. राजसाहेबांच्या निर्णयामुळे महायुतीला ताकद मिळाली असून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी शिवधनुष्य उचलले आहे याला अभिप्रेत होऊन काम करा आणि मावळातून धनुष्यबाणाच्या रूपाने खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेत पाठवा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
देशाच्या भविष्यासाठी राजसाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे देशाचा अभिमान जगात टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशाचा विश्वास आहे. 80 कोटी लोकांना अन्नधान्य, कोरोना काळात भारतासह इतर देशांनाही लस देणारा, भारताची अर्थव्यवस्था मजबूत करणारा, देशातील पायाभूत सुविधा मजबूत करणारा, देशाला विविध योजनांच्या अनुषंगाने सक्षम करणारा, देशाचा जगात सन्मान ठेवणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने नेता भारताला मिळाला आहे. देशाचा विकास करण्याबरोबरच संस्कृती, परंपरा संवर्धन करण्याचे काम आणि देशाची अस्मिता टिकवण्याचे काम मोदीजी करीत आहेत. त्यामुळे त्यांना साथ देत आप्पा बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शेकापची सत्ता राहिली, मात्र त्यांनी स्वार्थापोटी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविला नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचा झपाट्याने, तर आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात कोट्यावधींची विकासकामे सुरू आहेत. याचा फायदा आप्पा बारणे यांना नक्कीच फायदा होणार असून मनसैनिकांची साथ मिळणार आहे.
-अ‍ॅड. सत्यवान भगत, उरण तालुकाध्यक्ष, मनसे

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी तळागाळात पोहचले आहेत. त्यांची साथ खासदार श्रीरंग बारणे यांना आहे आणि राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाने मनसैनिक पाठीशी असून प्रत्येक ठिकाणी मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम करतील.
-दीपक कांबळी, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

स्वार्थासाठी राजकारण करणार्‍या उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने स्वाभिमानाच्या गोष्टी करू नयेत. पाचशे वर्ष आपला देव प्रभू राम ऊन- पावसात होता. त्याला सावलीत आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि उद्धव ठाकरे मात्र नुसत्याच स्वाभिमानाच्या गोष्टी करतायेत.
-योगेश चिले, पनवेल महानगर अध्यक्ष, मनसे

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply