Breaking News

रायगडात ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

लोकसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी असताना रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन व पोलीस यंत्रणेने तयारी केली आहे.

जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली होती. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील आराठी, काळीजे, दांडा (बागमांडला), शिरस्ते, गौळवाडी, नागलोली, हरेश्वर, भोस्ते, वडवली, बोर्लीपंचतन, वेळास, मारळ; पनवेल तालुक्यातील चिपळे, कुंडेवहाळ व कर्नाळा; कर्जत तालुक्यातील शिरसे, पाथरज, उरणमधील बांधपाडा; खालापुरातील उंबरे आणि माणगावमधील सणसवाडी यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे 15 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यापैकी काही सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी लगेचच दुसर्‍या दिवशी म्हणजे 25 मार्च रोजी होऊन निकाल समोर येणार आहेत.

जिल्ह्यात मागील वेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून बाजी मारली होती; तर भाजपनेही मुसंडी मारून प्रस्थापित पक्षांना धक्का दिला होता. आताही हे पक्ष ताकदीने निवडणूक लढवत आहेत.

उजव्या हाताला शाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येते, तसेच पुनर्मतदानावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत, मात्र लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत असल्याने शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply