Breaking News

चेन्नई कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी 381 धावांची, तर इंग्लंडला नऊ बळींची गरज

चेन्नई : वृत्तसंस्था

इंग्लंडने दिलेल्या 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाखेर भारतीय संघाने एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाला शेवटच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 381 धावांची गरज आहे, तर इंग्लंड संघाला ऐतिहासिक नऊ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल 15 आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा 12 धावांवर नाबाद होते. चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या डावात 241 धावांची आघाडी असतानाही इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसर्‍या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसर्‍या डावात भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करीत इंग्लंड संघाला 178 धावांवर रोखले. दुसर्‍या डावात फिरकीपटू आर. अश्विन याने सर्वाधिक सहा बळी टिपले, तर नदीमने दोन आणि बुमराह व इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अश्विनने रोरी बर्न्स, डॉमनिक सिब्ले, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन यांना शिकार केले. कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत त्याने 28व्या वेळेस पाचपेक्षाही जास्त गडी बाद करण्याची कमाल केली. शिवाय कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक पाच गडी बाद करणारा तो जगातील आठवा गोलंदाज ठरला आहे.पहिल्या डावात भारताचे दहाच्या दहा फलंदाज झेलबाद झाले. यापूर्वी 1988मध्ये हैदराबाद कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध आणि 2001मध्ये मुंबई कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे सर्व फलंदाज पहिल्या डावात झेलबाद होऊन माघारी परतले होते. गोलंदाजीच्या बाबतीत चौथ्या दिवशी भारताने दिलासादायक कामगिरी केलेली असताना आता संघाला विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 420 धावाचे लक्ष्य गाठण्याची. पाचव्या दिवशी एकूण 90 षटकांचा खेळ होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या तीन निष्कर्ष लावण्यात येत आहेत. जिथे विजयी पताका यजमान किंवा पाहुणा संघ उंचावेल किंवा मग हा सामना अनिर्णित म्हणून घोषित करण्यात येईल. तेव्हा आता नेमकी ही आकडेवारी आणि खेळाडूंचे प्रदर्शन कोणते परिणाम क्रीडारसिकांपुढे मांडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी अन् दमदार पराक्रम

पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने 578 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली, पण ऋषभ पंत-चेतेश्वर पुजारा जोडीने डाव सावरला. त्यांच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर-आर. अश्विन जोडीनेही डावाला स्थैर्य दिले. चौथ्या दिवसाच्या खेळात सुंदरने अर्धशतक (85*) ठोकत एक पराक्रम केला. त्याने ऑस्ट्रेलियातील आपली लय कायम राखत या सामन्यातही अर्धशतक ठोकले. आपल्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम त्याने केला तसेच परदेशीतील कसोटी पदार्पणात आणि मायदेशातील कसोटी पदार्पणात अशा दोन्ही सामन्यांत पहिल्या डावामध्ये अर्धशतक ठोकणार्‍या फलंदाजाला बहुमानही त्याने मिळवला आहे.

इशांत शर्माचे कसोटीत 300 बळी

वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कसोटी सामन्यात 300 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. असा पराक्रम करणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरोधात चेन्नई येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दुसर्‍या डावांत गोलंदाजी करताना इशांतने लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इशांतच्या नावावर 97 कसोटी सामन्यात 297 बळींची नोंद होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इशांतने दोन बळी घेतले. तर दुसर्‍या डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवत 300 बळींचा पल्ला पार केला आहे. याआधी भारताच्या पाच गोलंदाजांनी असा पराक्रम केलेला आहे.

आर. अश्विन छा गया!

टीम इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडने पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांना दुसर्‍या डावातील पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. कर्णधार विराट कोहलीने नव्या चेंडूवर पहिले षटक आर. अश्विनच्या हाती सोपविले आणि त्याने 100 वर्षांत कुणालाच न जमलेला पराक्रम करून दाखवला. अश्विनने पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याला बाद केले. अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये झेल टिपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर गेल्या 114 वर्षांत फिरकी गोलंदाजाला विकेट घेता आली नव्हती. अश्विनने हा विक्रम करून दाखवला. यापूर्वी 1888मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर 1907मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर अश्विनने हा मान पटकाविला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्‍या डावात सहा बळी मिळविण्याचीही किमया साधली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply