कृषी अधिकार्यांचे शेतकर्यांना आवाहन
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/04/Pali2-1024x552.jpg)
पाली : प्रतिनिधी
भातशेतीत अजूनही पारंपरिक राब भाजण्याच्या पद्धतीचाच वापर सुरु आहे. मात्र ही मशागतीची ही अयोग्य पद्धत असून, शेतकर्यांनी भातशेती मशागतीसाठी सुधारित चतूःसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले आहे.
भाताचे कोठार समजल्या जाणार्या रायगड जिल्ह्यात साधारण 1 लाख 10 हजार हेक्टरवर प्रत्यक्ष भाताची लागवड केली जाते. प्रती हेक्टरी सरासरी 26 ते 28 क्विंटल भाताचे उत्पादन घेतले जाते. मात्र शेतीची पुर्व मशागत करताना सर्रास राब भाजणी केली जाते. ही पद्धत अयोग्य आणि पर्यावरणास धोकादायक आहे, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने संशोधना अंती सांगितले आहे.
भात लागवडीची चतूःसुत्री
भात रोपवाटीकेतील तणांच्या नियंत्रणासाठी अलिकडे तणनाशकांचा वापरही परिणामकारकपणे करण्याचे किफायतशीर तंत्र विकसित करण्यात आले आहे.
सुत्र- 1 भातपिकाच्या अवशेषांच्या फेरवापर
सुत्र- 2 गिरीपुष्पाचा वापर
सुत्र- 3 नियंत्रित लागवड
सुत्र- 4 युरिया ब्रिकेटचा वापर
चतूःसुत्रीचे भातशेतीचे फायदे
हे तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकुण लागवडीच्या (बी, मजूर व खत यांचा) खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्चितपणे फायदेशिर करणारे आहे. छोटा शेतकरी खरीप हंगामात भाताचे सुधारित वाण वापरुन सरासरी 40 क्विंटल प्रती हेक्टर व संकरित भाताचे वाण वापरुन सरासरी 60 क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन घेऊ शकतो. असे तज्ञांचे
मत आहे.
राब भाजणीचे दुष्परिणाम
राब केल्याने, शेतजमीन भाजल्याने तेथील जमीनीतील शेतीसाठी उपयुक्त सुक्ष्मजीव नष्ट होतात परिणामी शेतीस पोषण व सेंद्रिय घटक मिळत नाही. तसेच राब भाजण्यासाठी झाडांची तोड होते. प्रदुषण वाढते परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडते. शेतकर्यांना पैसा व श्रम अधिक लागतो.