हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत असताना देशातील शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेतीपिकांची वाहतूक, वितरण आणि विक्री करण्यात शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी वार्यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवला जातो. यात एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.
या संदर्भात पहिल्या अंदाजाचे परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये पर्जन्यमानाविषयी माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद
महासागर यामध्ये होणार्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.