पाली तहसील व पोलीस ठाण्याला निवेदन

पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील चंदरगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या गावठी दारूचे उत्पादन व खुलेआम विक्री होत असल्याची तक्रार करीत तेथील आदिवासी बांधवांनी सोमवारी (दि. 26) पाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली. चंदरगाव आदिवासी वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दारू व्यवसाय चालतो. आदिवासी बांधवांना देशोधडीला लावणार्या गावठी दारूचा कायमचा बंदोबस्त व्हावा याकरिता वाडीतील आदिवासी महिला, शाळकरी मुले व ग्रामस्थांनी सोमवारी पाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या वेळी चंदरगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावठी दारूची निर्मिती, वाहतूक व विक्री बंद करावी, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना देण्यात आले. चंदरगाव ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार रायन्नावर यांनी या वेळी दिले.