नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
ज्या समाजाला आपले मत मांडण्यासाठी हक्काचे माध्यम नव्हते, अशा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी ’मूकनायक’ हे पाक्षिक सुरु केले. या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या चवळवळीला मुकनायकने भक्कम पंख दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, आणि संविधान अभ्यासक शामसुंदर सोन्नर यांनी केले. ’मूकनायक’ या पाक्षिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त नवी मुंबई येथील सत्याग्रह महाविद्यालयात आयोजिलेल्या व्याख्यानमालेत सोन्नर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार चंदन शिरवाळे उपस्थित होते.
सोन्नर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीला वेग आला होता. मात्र त्याचे प्रतिबिंब तत्कालीन वृत्तपत्रात उमटत नव्हते. बाबासाहेब यांचे विचारही अपवादानेच छापून येत होते. कोणत्याही चळवळीचे मुखपत्र हे त्या चळवळीचे पंख असतात हे डॉ. आंबेडकर जाणून होते. म्हणूनच त्यांनी ’मूकनायक’ च्या माध्यमातून समाजासाठी हक्काचे माध्यम निर्माण केले. आजही मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र निघत आहेत. न्यूज चॅनल निघत आहेत. तिथेही दीन-दुबळ्यांच्या वेदना मांडल्या जात नाहीत. म्हणून आंबेडकरी अनुयायांनी स्वतःची प्रसिद्ध माध्यमे उभी करावीत, असे आवाहन सोन्नर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. संगीता जोगदंड तर आभार प्रदर्शन प्रा. मंगेश कांबळे यांनी केले. प्राचार्या वनिता सूर्यवंशी यांच्यासह प्रा. सुजाता भोसले, प्रा. सरिता काटे, प्रा. तेजश्री तूपारे, प्रा. सुप्रिया वाघमारे, प्रा. सतीश मडले, प्रा. ललिता यशवंते, प्रा. स्वाती राऊत यावेळी उपस्थित होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper