Breaking News

कोकणातील समुद्रात जेलीफिशचा वावर; मच्छीमार त्रस्त

मालवण : प्रतिनिधी
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील समुद्रात विषारी जेलीफिश आढळून येत आहे. त्यामुळे मच्छीमार त्रस्त झाले आहेत. मासेमारीसाठी मच्छीमार खोल समुद्रात जातात, मात्र त्यांच्या जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत आहेत. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने मत्स्य व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.
कोकणाला 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या किनारपट्टीवरील बहुतांश लोकांचा मत्स्य व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून आहे. आता कोकणातील याच मच्छीमारांसमोर विषारी जेलीफिशचे संकट उभे राहिले आहे. समुद्रात मासेमारीला घातक जेलीफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे माशांच्या उत्पादनदेखील घट झाली आहे.
सध्या खोल समुद्रात जेलीफिश वाढल्याने जाळ्यात जेलीफिशचे प्रमाण जास्त असून मासळी फार कमी मिळत आहे. त्यामुळे मच्छिमारीसाठीचा खर्चदेखील सुटत नसल्याची परिस्थिती असल्याचे चित्र आहे. मासेमारीसाठी टाकलेली जाळीत विषारी जेलीफिशने भरून निघते. ही जेलीफिश जाळीतून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर हाताला खाज सुटते. विषारी जेलीफिश आणि मत्स्य उत्पादनात होणारी तूट यामुळे मच्छीमार संकटात सापडला आहे.
आधीच हवामान बदलाचा परिणाम मासेमारी होत असल्याने माशांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला मच्छीमार या जेलीफिशमुळे आणखी अडचणीत येऊ लागला आहे. जेलीफिशला निमॅटिस म्हणजे विषारी दंश करणारे काटे असतात. त्यातून ते विषारी द्रव्य दंश करून शरीरात सोडतात. त्यामुळे हा दंश झाल्यावर पाय सुजणे, हातापायावर पुरळ येणे, त्वचा लाल होण्यासह श्वास घ्यायला त्रास होण्याच्या तक्रारी रुग्णांमध्ये आढळतात.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply