रस्त्याच्या कडेला बसणार्या व्यावसायिकांमुळे अपघाताचा धोका
पाली ः प्रतिनिधी
पालीमध्ये परिसरातील आदिवासी बांधवांसह अनेक स्थानिक भाजीपाला व फळविक्रेते आपला व्यवसाय थाटून उदरनिर्वाह करीत आहेत, मात्र हे या व्यावसायिकांना स्वतंत्र भाजीमार्केटची सोय नसल्याने रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे बसून त्यांना आपला व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र भाजीमार्केटची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पालीमध्ये प्रामुख्याने बाजारपेठ, मिनिडोअर स्टँड ते पाली बसस्थानक, गांधी चौक, जुने एसटी स्टँड, मारुती मंदिर नाका व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फळभाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी बसतात. रस्त्याच्या कडेला त्यांना पुरेशी जागादेखील नसते, मात्र नाईलाजाने त्यांना तिथे बसावे लागते. प्रामुख्याने आदिवासी महिला पहाटे लवकर गावाठी भाजीपाला, फुले, आंबे, काजूगर, कोकम, आंबे आणि रानमेावा घेऊन पालीकडे यायला निघतात. स्थानिक मच्छीमारदेखील गोड्या पाण्यातील मच्छी विक्रीसाठी आणतात. रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाखाली किंवा दुकानाच्या शेडखाली अथवा मग मोकळ्या जागेत या महिला विक्रीसाठी ठाण मांडतात. अशा परिस्थितीत विक्रेते आणि ग्राहकांची रस्त्याच्या बाजूला रेलचेल असते. त्यामुळे वाहतुकीवर परिणामदेखील होतो. त्यामुळे या विक्रेत्यांना शासनाकडून हक्काची जागा दिल्यास हे विक्रेते त्या ठिकाणी बसून आपला माल विकतील. वारंवार होणारी वाहतूक कोंडीही होणार नाही. या व्यावसायिकांसाठी स्वतंत्र भाजीमार्केटची निर्मिती करण्याची मागणी जोर धरीत आहे.
मोक्याची जागा हवी
पालीतील भाजीमार्केटची जागा फारशी मोठी नाही. तिथे काही थोडेच विक्रेते बसतात. रस्त्यावर विक्री करणार्या फळभाजीपाला विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यासाठी मोकळी व मोक्याची जागा आवश्यक आहे. शासकीय किंवा गावठाण जागेचा वापर यासाठी होऊ शकतो, मात्र त्यासाठी शासकिय व ग्रामपंचायतीची इच्छाशक्ती आणि त्याबरोबरच पुरेसा निधी आवश्यक आहे.