डांबरीकरणाद्वारे काम सुरू; जनतेतून समाधान
पाली ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आता कल्याण इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून महामार्गाच्या कासू ते इंदापूर टप्प्यात डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. पुढील अडीच वर्षांत सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी वर्गाला दिलासा मिळाला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या महामार्गाचे काम रखडल्याने प्रवास करताना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. शारीरिक व्याधी व आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागतोय. त्यामुळेच भाजप-बाळासाहेबांची शिवसेनेचे सरकार आल्यानंतर महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. या मार्गावरील खड्डे डांबर वापरून बुजविण्यास सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने हे काम होणार आहे. वाकण येथील पांडुरंग गायकर म्हणाले की, लवकरात लवकर हा मार्ग पूर्णत्वास येऊन आमचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा अशी अपेक्षा आहे. केवळ खड्डे न बुजवीता लवकरात लवकर दर्जेदार काँक्रीटीकरण व्हावे यासाठी सरकारने लक्ष द्यावे हीच विनंती आहे. कल्याण येथून महाडकडे जाणारे प्रवाशी बाबूराव जाधव यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास म्हटलं की नको वाटते. रस्त्याच्या दुरावस्थेने वाहतूक कोंडीची समस्यादेखील उद्भवते. सद्या महामार्गावरील खड्डे डांबरीकरणाने बुजवले जात आहेत, ही बाब दिलासा देणारी आहे, महामार्ग खड्डेमुक्त झाला तरी कोकणवासीयांचा व प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होईल, याचे समाधान वाटते. महामार्गावर आता डांबरीकरण वेगाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशी, वाहनचालक, रुग्णांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होणार आहे. महामार्गाचे मजबूत व दर्जेदार काम व्हावे अशी अपेक्षा कोकणवासीय व प्रवाशी जनतेतून व्यक्त होतेय.