Breaking News

श्रमदानातून केली विहिरीची स्वच्छता

रसायनी : प्रतिनिधी

राज्यात पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. विहिरी आणि तलावाच्या पाण्याने तळ गाठल्याने, दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक नागरिकांना तर पिण्याच्या पाण्यासाठी घोडदौड करावी लागत आहे. असाच प्रकार खालापूर तालुक्यातील वनवे गावात दिसू लागलाय. ऐन उन्हाळ्यात विहिरीने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

वनवे गावातील नागरिकांनी ‘जल है तो कल है’ या म्हणीचे गांभीर्य जाणून मुख्य विहिरीच्या  साफसफाईसाठी पुढाकार घेतला. सरकारी निधी आणि राजकारण्यांच्या भूलथापांना बळी न पडता, गावातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत श्रमदानातून गावाला पाण्याचा मुख्यस्रोत असणार्‍या विहिरीची साफसफाई केली.गाव करील ते राव काय करील हे पुन्हा एकदा वनवे गावातील नागरिकांनी दाखवून दिले आहे. पुरुषांनी विहिरीत उतरून संपूर्ण गाळ काढला, तर महिलांनी विहिरीचा परिसर झाडेझुडपे साफ केली. या उपक्रमासाठी गावातील किशोर पवार, मोहन घोलप, नितीन घोलप, रामचंद्र घोलप, तुकाराम घोलप, ज्ञानेश्वर पारठे, मधुकर पारठे,  संजय पारठे,  राजेश जाधव, योगेश पवार, तसेच महिलांमध्ये रोहिणी पवार, द्वारका घोलप, ताराबाई पवार, लता प्रबळकर, जयश्री पारठे आदी नागरिक उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply