लंडन : वृत्तसंस्था
विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियावर मात केल्याने गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रलियाची दुसर्या स्थानी घसरण झाली असून, भारताने पहिले स्थान पटकाविले आहे. यासोबतच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा सात गडी राखून दणदणीत पराभव केल्याने गुणतालिकेत भारत 15 गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला. पुन्हा अव्वल स्थान गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला त्यांचा आफ्रिकेविरोधातील सामना जिंकणे आवश्यक होते, मात्र आफ्रिकेकडून पराभव झाल्याने ते 14 गुणांसह दुसर्या स्थानावर स्थिरावले. 12 गुणांसह इंग्लंड तिसर्या स्थानी, तर न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये 9 जुलै रोजी मँचेस्टर येथे, तर दुसरा सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलियामध्ये 11 जुलैला बर्मिंगममध्ये खेळला जाईल.