Breaking News

तांबस-बारणे रस्ता गेला वाहून; वाहतूक बंद

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

सततच्या पावसामुळे राजनाला कालव्यातून वाहून आलेले पाणी कर्जत तालुक्यातील चिंचवली-कडाव-तांबस-जांभिवली रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्याचा तांबस येथील भाग वाहून गेला आहे. त्यामुळे बारणे गावाच्या अलीकडे असलेल्या ग्रामस्थांना पलीकडे कडाव येथे जाणे बंद झाले आहे.

कर्जत तालुक्यातील कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव रस्त्यालगत राजनाला कालवा आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यास कालव्यातील पाणी बाहेर येत नाही, मात्र ज्यावेळी जास्त आणि सतत पाऊस असतो, त्यावेळी पावसाचे पाणी हे कालव्याच्या बाहेर पडते आणि ते बाजूच्या रस्त्यावरून वाहून जाते. या रस्त्यावरील पाईप मोर्‍या अनेक ठिकाणी मातीने भरून गेल्या असून, त्यातून पाणी वाहून जाण्याचे बंद झाले आहे. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्याचा भाग वाहून गेला आहे. परिणामी या परिसरातील किमान 15 गावांची वाट बंद झाली आहे. राजनाला कालव्याचे काम पाटबंधारे विभागाकडे आहे, तर रस्त्यांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. कालव्याच्या पाण्यामुळे तांबस येथील रस्त्याचा भाग वाहून गेला आहे, मात्र वाहून गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कुणी करायचे यावरून पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply