Breaking News

माणगावमध्ये महायुतीच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरेंना निवडून आणण्याचा निर्धार

माणगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकार्‍यांचा मेळावा सोमवारी (दि.1) माणगाव येथील कुणबी भवनात उत्साहात झाला. या वेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
या मेळाव्यास महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सतिश धारप, शिवसेना नेते अ‍ॅड. राजीव साबळे, संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते, बिपीन म्हामुणकर, शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव यशोधरा गोडबोले, मुक्तार वेळासकर, नाझीम हासवारे, महादेव बक्कम, सुभाष केकाणे, आनंद यादव, राजेंद्र शिर्के, श्वेता देशमुख, नीलिमा घोसाळकर, योगिता चव्हाण, नितीन दसवंते, शादाब गैबी, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, नितीन वाढवळ, अरुणा शेट, संगीता बक्कम, तुकाराम केसरकर, दीपक जाधव, बाबूशेठ खानविलकर, हुसेन रहाटविलकर, संजय मपारा, निलेश थोरे, काका नवगणे, उदय अधिकारी, नितीन घोणे, शर्मिला सुर्वे, ममता थोरे, सचिन बोंबले यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी खासदार सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत एका निर्धाराने व आत्मविश्वासाने आपण जमलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. याकडे पाहत अजितदादांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासासाठी आणि बहुजनांच्या व्यापक हितासाठी आम्ही सारी मंडळी सत्तेत सहभागी झालो. मी राष्ट्रवादीचा नव्हे; तर महायुतीचा खासदार म्हणून विजयी होणार आणि तुमच्या सर्वांची मान उंचावेल असे काम करेन. सत्तेत असल्यावर मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघातील विकासकामे करता येतात. महायुतीच्या माध्यमातून विकास हेच आपण नजरेसमोर ठेवले आहे. यापुढे येणारी प्रत्येक निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आपण लढविणार असून तुमचा खासदार म्हणून मी सर्वतोपरी सहकार्य करेन.
आमदार रविशेठ पाटील यांनी, देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख देशाला मिळालेली ईश्वरी देणगी असा केला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश पुढे जात आहे. त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून देशवासीयांचे जीवन सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तर राज्यातही महायुतीचे सरकार जोमाने वाटचाल करीत विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. सर्व घटक पक्ष मिळून सुनील तटकरेंना विजयी करू, असे प्रतिपादन केले.
आमदार भरत गोगावले यांनी म्हटले की, देशात सत्ता आपण आणतोय. पुन्हा महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी ही लढाई आल्याला फार मोठ्या फरकाने जिंकायची आहे. 7 मे रोजी रायगड लोकसभेची निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. महायुतीने महाराष्ट्रात 45पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा चंग बांधला असून पुन्हा एकदा आपल्याला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना विराजमान करायचे आहे. त्यासाठी आपण सर्वार्ंनी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे. आपले उमेदवार खासदार सुनील तटकरे यांना महाड मतदारसंघातून भरघोस मताधिक्य देणार असून राज्यातील पहिल्या 10 खासदारांमध्ये तटकरे निवडून येतील.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी, निवडणूकपूर्व काळ होता त्या वेळी साहजिकच प्रत्येक पक्षाला आपण पुढे जावे असे वाटत होते. भाजप व शिवसेनेतर्फे काही नावे सुचवण्यात आली होती, परंतु चार दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ते आपल्या महायुतीचे उमेदवार असून त्यांना आपण सर्वांनी निवडून आणायचे आहे, असे सांगितले.
भाजपचे ज्येष्ठ नेते सतिश धारप म्हणाले की, सशक्त भारत, सार्वभौम भारत, विकसित भारत यासाठी आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. शिवसेनेचे युवानेते विकास गोगावले, भाजपचे महेश मोहिते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनीही मनोगत व्यक्त करून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मतांनी रायगडचे खासदार म्हणून पुन्हा निवडून आणण्यासाठी झटून कामाला लागण्याचे आवाहन केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र शिर्के यांनी व्यक्त केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply