सिडनी : वृत्तसंस्था
महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे भारतीय संघाने गट फेरीतील गुणांच्या आधारे अंतिम फेरीत
प्रवेश केला.
गट ‘अ’मध्ये असलेल्या भारतीय संघाने आठ गुणांसह अव्वल स्थान मिळवले होते, तर गट ‘ब‘मध्ये इंग्लंडचा संघ सहा गुणांसह दुसर्या स्थानावर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार गट फेरीतील गुणांच्या आधारे भारत अंतिम फेरीत दाखल झाला.
भारतीय महिला संघाची आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी भारत 2009, 2010 आणि 2018मध्ये उपांत्य फेरीत दाखल झाला होता. गेल्या म्हणजे 2018च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. अंतिम सामना 8 मार्च या जागतिक महिला दिनी खेळविला जाणार आहे.
इंग्लंडची कर्णधार हताश
पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर कमनशिबी ठरलेल्या इंग्लंडच्या संघाची कर्णधार हेदर नाईट हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा पद्धतीने स्पर्धेबाहेर होणे तापदायक आहे. उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नाही. खेळण्याची संधीही मिळाली नाही. याचा अर्थ अप्रत्यक्षपणे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या पराभवाचा फटका आम्हाला बसला. साखळी सामन्यातील पहिल्या पराभवानंतर आम्हाला काहीही करून उपांत्य फेरी गाठायची होती. आम्ही ते करून दाखवले, पण हवामानाचे कारण देत आम्हाला स्पर्धेतून बाहेर काढणे क्लेशदायक आहे, अशा शब्दात नाईट हिने संताप व्यक्त केला.