Breaking News

कर्जतमध्ये श्रमदानातून पाणीटंचाई दूर

वेणगावच्या तरुणांकडून लॉकडाऊनचा सदुपयोग

कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील वेणगावमधील तरुणांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करून 25 दिवसांच्या कालावधीत श्रमदान करून बुजलेला नाला साफ केला आणि पाणी वेणगावपर्यंत आणले. ऐन उन्हाळ्यात धरणात भरपूर पाणी साठल्याने या गावचा पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. सर्वच गोष्टींसाठी शासनावर अवलंबून न राहता जिद्द, एकी व श्रमदानातून हे शक्य झाले आहे.
वेणगाव या सुमारे दोन ते अडीच हजार वस्ती असलेल्या गावाला बोरिंग वगळता पाण्यासाठी अन्य कोणताही नैसर्गिक स्रोत नाही. 10-12 वर्षांपूर्वी टाटा पॉवर हाऊसचे पाणी गावातील छोट्याश्या बंधार्‍यात अडवून ते मार्च-एप्रिलपर्यंत पुरविले जात असे. राजानाला कालव्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर पाणी येणे बंद झाले. पाणी उपलब्ध नसतानासुद्धा खोल बोअरवेल मारून इमारती उभ्या राहिल्या. परिणामी फेब्रुवारी महिन्यातच या बोअरवेल कोरड्या पडू लागल्या. अशातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. गावातील काही तरुणांच्या मनात लुप्त झालेला नाला पुन्हा बंधार्‍यापर्यंत आणता येईल का, याबाबत विचार सुरू झाला. साधनसामग्री फारशी नसल्याने वर्गणी काढून कधी रात्रंदिवस स्वतः हातात कुदळ-फावडे घेऊन, तर कधी आवश्यकता असेल तेव्हा जेसीबी घेऊन नाल्याच्या सफाईला सुरुवात झाली.
हाती कमी दिवस होते. नंतर नाल्याचे पाणी बंद होणार होते. नया दौर चित्रपटातील ‘साथी हात बढाना’ या गीताप्रमाणे 30 दिवसांपेक्षा कमी दिवसांत सुमारे 2.5 किलोमीटर नाला साफ झाला. अशा प्रकारे गंगा अवतरून बंधारा भरला. लॉकडाऊनचा असा सदुपयोग केल्याबद्दल सर्व तरुणांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply