नवी दिल्ली : वृत्तसंस्था
21व्या शतकातील भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने होते आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांतील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भातील परिषदेत ते बोलत होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकर्या, कामाचे स्वरूप यामध्ये होणार्या बदलांची चर्चा होते आहे. अशात कौशल्य आणि ज्ञान यावर आधारित शिक्षण धोरण असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नव्या शिक्षण धोरणाचे महत्त्व या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषद केले. ते म्हणाले, नवे शिक्षण धोरण हे स्टडिंगऐवजी लर्निंगवर फोकस करणारे आहे तसेच अभ्यासक्रमापेक्षाही या धोरणात आव्हानात्मक विचारांना प्राधान्य देण्यात आले आहे. एवढेच नाही तर विविध भाषांवरही भर देण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान कसे प्राप्त होईल याकडे नव्या शिक्षण धोरणात लक्ष्य केंद्रित करण्यात आला आहे.
नवे शिक्षण धोरण हे देशाचे शिक्षण धोरण आहे, सरकारचे नाही. ज्या प्रकारे परराष्ट्र धोरण असते, सुरक्षासंदर्भातील धोरण असते अगदी तशाच प्रकारे या शिक्षण धोरणाचे स्वरूप आहे. शिक्षण धोरणासंदर्भात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्या मनात अनेक प्रश्न असतील. या सगळ्या प्रश्नांचे निराकरण करून ते आखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
Check Also
टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …
RamPrahar – The Panvel Daily Paper