Breaking News

‘मिठाईवर एक्सपायरी डेट टाकणे बंधनकारक’

अलिबाग : जिमाका

खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेले पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत (एक्सपायरी डेट) ठळकपणे नमूद करणे हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना  1 ऑक्टोबरपासून बंधनकारक करण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण अं. दराडे यांनी स्पष्ट केले आहे.

बर्‍याच दुकानातून छोट्या कागदी बॉक्स मधून मिठाईची विक्री केली जाते. मात्र त्यावर ही मिठाई कधीपर्यंत खाणे योग्य आहे, याचा उल्लेख नसतो. हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांकडून विक्री केले जाणारे गोड पदार्थ किती दिवसांपर्यंत खाणे योग्य राहू शकतात, हे ग्राहकांना न समजल्यामुळे बर्‍याच वेळा मिठाईचे सेवन केल्याने ग्राहकांच्या आरोग्यास अपाय होऊन अन्न विषबाधेसारखी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी अन्नसुरक्षा व मानके प्रधिकरणांने 25 जून 2020 रोजी आदेश निर्गमित केले असून, हे आदेश 1 ऑक्टोबरपासून अंमलात आले आहेत. 

यापुढे मिठाई किती दिवसांपर्यंत खाण्यास योग्य आहे, हे सर्व मिठाई विक्रेत्यांना जाहीर करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे ही मिठाई कधी तयार केली आहे, हे सुद्धा दुकानदार त्यांच्या दुकानात प्रदर्शित करू शकतात. या बाबींचे उल्लंघन करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply