नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी आरपीआयचा पाठिंबा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या रायगड, ठाणे, पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (दि. 6) केली.  
 नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कृती समितीने येत्या 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलन पुकारले असून या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत, असे रामदास आठवले यांनी मुंबईत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.
रायगडचे थोर सुपुत्र, माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नवी मुंबईच्या उभारणीत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान आहे. कोकणात शिक्षण प्रसारातही त्यांचे बहुमोल योगदान आहे. नवी मुंबई, रायगड या भागात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले. त्यांचे सामाजिक योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव दिले पाहिजे ही स्थानिक भूमीपुत्रांची मागणी योग्य आहे आणि त्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा …

Leave a Reply