पेण ः दि. बा. पाटील 86व्या वर्षी आजारी असतानाही 2012 साली आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यांची जन्मभूमी व कर्मभूमीत होणार्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. त्यांचे नाव राज्यातील इतर प्रकल्पांना देता येईल, परंतु ‘दिबां’नी या भूमीसाठी रक्त सांडले. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला ‘दिबा’ंचे नाव देण्यासंदर्भात 24 जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 19) पेण येथे मार्गदर्शन करताना केले. 24 जून रोजी सिडको भवनाला घेराव आंदोलनाबाबतच्या नियोजन, आखणी व अन्य बाबींबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी पेण येथील वैकुंठ निवास येथे बैठक झाली. या वेळी पेणचे आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते वैकुंठ पाटील, राजेश मापरा, भाजप जिल्हा सहचिटणीस मिलिंद पाटील, मारुती देवरे, सोपान जांभेकर, बंडू खंडागळे, अनिरुद्ध पाटील, विशाल शिंदे, श्रीकांत पाटील, ललित पाटील, भास्कर पाटील, वासुदेव म्हात्रे, अशोक पाटील, हिमांशू कोठारी, अमृत पाटील, वंदना पाटील, अविनाश पाटील, नरेंद्र मोकल, विजय पाटील, मोहन नाईक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. दिबा पाटील हे भूमिपुत्रांचे नेते आहेत. अनेक आंदोलने करून त्यांनी आपले रक्तही सांडले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमीत होणार्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यायला हवे, असे आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी ठणकावून सांगितले.
Check Also
कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा -मंत्री ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये कृतज्ञता मेळावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार पनवेल : …
RamPrahar – The Panvel Daily Paper