खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
राजकारण करताना मतभेद असावे पण मनभेद नसावेत, दुसर्यावर टीका करताना ती वैयक्तिक नसावी, असे नियम पाळले तर, राजकारणात यशस्वी होता येते, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (दि. 4) खोपोली येथे केले. खोपोली नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. आठवले यांच्या हस्ते सोमवारी झाले, त्या वेळी समारंभात ते बोलत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी कठोर परिश्रम घेतले, समाज बांधवांनी बाबासाहेबांचा विचार घेऊन आपली वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. आपल्या नेहमीच्या शैलीत ना. रामदास आठवले यांनी या वेळी शिघ्र कविता सादर करून टाळ्या मिळविल्या. उपनगराध्यक्ष विनिता कांबळे यांनी प्रास्ताविक केले. खासदार बारणे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, नगराध्यक्ष सुमन अवसरमल यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरगजे यांनी केले. नगरसेविका केविना गायकवाड यांनी आभार मानले. रिपाइं कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, गटनेते सुनील पाटील, मंगेश दळवी, तहसीलदार आयुब तांबोळी, मुख्याधिकारी अनुप दुरे, समीर मसुरकर, रिपाइं युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, धर्मानंद गायकवाड यांच्यासह नगरसेवक, विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, खोपोली भाजपतर्फे ना. आठवले यांचे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष शोभा काटे, युवा नेते सचिन मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Check Also
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper