उरणच्या किनार्यावर सुरक्षित; कर्मचारी सुखरूप
उरण : प्रतिनिधी
मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनार्यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवी मुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. बुधवारी मुंबईकडून एसएन ऑल कंपनीचे एमव्ही-श्रीकांत आणि अरब इंटरप्राईझेस कंपनीचे एमव्ही-जी-दोन या दोन मालवाहू बार्ज रायगड जिल्ह्यातील धरमतर येथील इस्पात कंपनीकडे निघाल्या होत्या. मात्र वादळामुळे समुद्रात उसळणार्या उंचच लाटांमुळे नांगर तोडून या दोन्ही बार्ज भरकटून उरण तालुक्यातील केगाव-माणकेश्वर मंदिराच्या किनार्यावर येऊन ठेपल्या. एमव्ही-श्रीकांत ही रिकामी बार्ज केगाव-माणकेश्वर मंदिराजवळील तर एम व्ही-जी-दोन अरब इंटरप्राईझेस ही दुसरी बार्ज सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजा-एनएडी नेव्ही जेट्टीच्या खडकाळ किनार्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लागल्या आहेत. या दोन्ही मालवाहू बार्जची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरने पाहणी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper