Breaking News

वादग्रस्त वक्तव्याचे काँग्रेसकडून समर्थन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला समाचार

चंदीगड : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबमधील अबोहर येथे एक प्रचारसभा घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर जोरदार प्रहार केला. ’यूपी, बिहार आणि दिल्लीतील भैय्या पंजाबवर राज्य करू पाहत आहेत. त्यांना येथे प्रवेश देऊ नका’, असे वादग्रस्त व्यक्त मुख्यमंत्री चन्नी यांनी केले होते. चन्नी यांच्या याच वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाचार घेतला. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आणि दिल्लीतील घराणेशाहीच्या मालकाने त्यांच्या शेजारी उभे राहून टाळ्या वाजवल्या. हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. या वक्तव्यामधून कोणाचा अपमान केला जातोय, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला. पंजाबमध्ये असे एकही गाव नसेल, जिथे उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील आमचे बंधू-भगिनी कष्ट करत नसतील. आम्ही कालच संत रविदासजींची जयंती साजरी केली. संत रविदासजींचाही जन्म उत्तर प्रदेशातील बनारसमध्ये झाला, पण काँग्रेस म्हणते उत्तर प्रदेशातील भैय्यांना घुसू देणार नाही. मग संत रविदासजींनाही काढणार का? श्री गुरु गोविंद सिंग यांचा जन्म बिहारमध्ये झाला होता. काँग्रेस म्हणते, बिहारींना घुसू देणार नाही. मग काँग्रेस श्री गुरू गोविंद सिंग यांचा अपमान करत नाहीए का?, असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला. कुमार विश्वास यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना घेरले. केजरीवाल यांच्या विश्वासू मित्राने केलेला आरोप अतिशय गंभीर आहे. असे असेल तर ते धोकादायक आहे. त्यांच्या हेतूंबद्दल त्यांनी कुमार विश्वास जे म्हटले आहे, ते प्रत्येक मतदाराने आणि देशवासीयांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे लोक पंजाब तोडण्याचे स्वप्न पाहत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी ते फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्यास तयार आहे. सत्ता मिळवण्यासाठी देशाचे तुकडे करावे लागले, तर त्याचीही तयारी आहे. त्यांचा आणि देशाचे शत्रू असलेल्या पाकिस्तानचा अजेंडा वेगळा नाहीए. त्यामुळे सीमेवर बीएसएफचे क्षेत्र वाढवण्यास त्यांचा विरोध आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. पंजाबने किती जखमा सहन केल्या आहेत हे फुटीरतावाद आणि अराजकतेच्या नशेत असलेल्यांना माहिती नाहीए. पण पंजाबचे सुपुत्र देशासाठी बलिदान देण्यासाठी कायम पुढे राहिले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply