पोलिसांनी कारवाई करण्याची गरज
पनवेल ः वार्ताहर
रेल्वेस्थानकात अनेक वेळा रूळ ओलांडू नका, रेल्वेरूळ ओलांडणे धोकादायक आहे, असा स्पीकरवरून संदेश दिला जात असतो. याकरिता प्रवाशांना ठराविक ठिकाणी सूचनादेखील दिल्या जात असून, नवी मुंबईमधील सर्वांत मोठे रेल्वे स्थानक असलेल्या पनवेल रेल्वेस्थानकात या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे.
शेकडो प्रवासी रेल्वेरूळ ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. स्थानकात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे पसरलेले असूनदेखील या प्रवाशांबाबत रेल्वे पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे.
अनेकांना कार्यालय गाठण्याची किंवा घरी जाण्याची घाई असते. अशावेळी अनेक जण पुलांचा सुरक्षित पर्याय सोडून चटकन रेल्वेस्थानक गाठण्यासाठी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात त्यातून अपघात घडतात. शनिवारी मोठ्या प्रमाणात रेल्वेरुळ ओलांडताना पहावयास मिळाले. त्यामध्ये रेल्वे ओलांडताना अनेक प्रवाशांचा मृत्यूही झाला आहे. याकडे रेल्वे पोलिसांनी गांभिर्याने लक्ष देऊन धोकादायकरित्या रेल्वेरूळ ओलांडणार्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.