उरण : वार्ताहर
सध्या चांगलीच थंडी पडू लागली आहे. या गारेगार वातावरणात उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात कडधान्य पिकांना बहर आला आहे. त्यामुळ येथील शेतकरीवर्ग आनंदी आहे.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने शेतकर्यांनी दीपावलीनंतर रब्बी हंगामातील कडधान्य लागवडीस सुरुवात केली. त्यामुळे थोडासा विलंब झाल्याने चालू हंगामात कडधान्य पिकांबाबत थोडीशी साशंकता होती, ही पिके चांगलीच बहरली असल्याचे चित्र चिरनेर परिसरात पहावयास मिळत आहे. अधूनमधून पडणारे दाट धुकेही पिकांच्या लागवडीस पोषक ठरत असल्याचे विभागातील शेतकरी कृष्णा म्हात्रे, प्रफुल्ल खारपाटील, हरिश्चंद्र गोंधळी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चिरनेर येथील शेतकर्यांनी आपआपल्या शेतात वाल, चवळी, हरभरा, राई, मूग, मटकी, तूर, पावटा, घेवडा आदी कडधान्य पिके घेतली आहेत. यापैकी चवळी, मूग व मटकीची पिके तयार होऊ लागली आहेत. पुढील काही दिवसांनी सर्वच कडधान्य पिके तयार होतील. ढगाळ वातावरण व कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला नाही तर अखेरच्या मोसमापर्यंत सर्वच पिकातून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा येथील शेतकर्यांना आहे.
Check Also
पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper