पेण ः प्रतिनिधी
पेण-खोपोली मार्गावर पेणजवळ वाक्रुळ येथे रविवारी (दि. 19) संध्याकाळी ट्रक आणि इकोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व मयत आणि जखमी हे संत बाळूमामांच्या यात्रेसाठी इको (एमएच ए-1003)मधून कोल्हापूरच्या दिशेने चालले होते, तर ट्रक (एमएच 43- बीजी 3234) खोपोलीहून पेणकडे येत होता. वाक्रुळजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की इकोमधून प्रवास करणारे विक्रम गोविंदराव दिंडे (50), चालक नागेश विक्रम दिंडे (24) व प्राजक्ता नागेश दिंडे (25) जागीच ठार झाले, तर याच गजानन चंदन वडगावकर, (13), विकी विठ्ठल श्रीरामे (15) मीनक्षी विक्रम दिंडे (22), कविता विक्रम दिंडे (45) व विठाबाई संजू वडगावकर हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील दिंडे परिवार हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने ते पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत. दरवर्षी ते कोल्हापूरमधील संत बाळूमामा यात्रेसाठी जात असतात. या वर्षीही निघाले असताना अपघात झाला. या अपघाताची नोंद पेण पोलिसांत करण्यात आली आहे.अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. देवदूत टीमनेही कार्यवाही करून जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट देऊन पाहणी केली.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper