नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये म्हणून दबाव वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीने याबाबतचा चेंडू सरकारकडे टोलवला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळावा अथवा खेळू नये, याचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी शुक्रवारी (दि. 22) स्पष्ट केले.
वर्ल्डकपमध्ये पाकसोबत खेळण्याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासक समितीने महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत अंतिम निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच घेण्यावर सर्वांचे एकमत झाले, असे विनोद राय यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
वर्ल्डकपला अजून तीन महिन्यांचा अवकाश आहे. या कालावधीत पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत वस्तुस्थिती आम्ही आंतरराष्ट्रीय
क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) ठेवणार आहोत. दहशतवाद पोसणार्या देशांशी कोणत्याही प्रकारचे
संबंध ठेवले जाऊ नयेत, असा मुद्दाही आम्ही आयसीसीपुढे मांडणार आहोत, असे राय यांनी नमूद केले.
आयपीएलचे उद्घाटन साधेपणाने होणार!
आयपीएलचा उद्घाटन सोहळा यंदा साधेपणाने करण्यात येणार आहे. यातून वाचणारी रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे बीसीसीआयच्या प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी या वेळी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper