अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेतर्फे (राजिप) आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात नियोजन नसल्यामुळे गोंधळ उडाला. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम जिल्हाधिकरी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे होणार होता, परंतु तेथील अव्यवस्थेमुळे हा कार्यक्रम पीएनपी नाट्यसंकुलात घेण्यात आला. तेथे गोंधळातच हा कार्यक्रम उरकण्यात आला.
शिक्षक दिनाच्या दिवशी (दि. 5) राजिपतर्फे दरवर्षी जिल्ह्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गैरविण्यात येते. गणेशोत्सव असल्यामुळे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम सोमवारी (दि. 9) आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नियोजन भवन येथे होणार होता, परंतु तेथे जागा अपुरी पडली. त्यामुळे जिल्हा परिषदेला कार्यक्रमाचे ठिकाण बदलावे लागले. हा कार्यक्रम पीएनपी नाट्यसंकुलात घेण्यात आला. कर्मचार्यांनी पीएनपी नाट्यगृहात येऊन तयारी केली. तेथेही गोंधळ सुरूच होता. नियोजनाचा अभाव व शिक्षकांचा बेशिस्तपणा अशा गोंधळाच्या वातावरणात हा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. खासदार सुनील तटकरे, शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, शिक्षण सभापती नरेश पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुश्रुता पाटील, चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात आदी कार्यक्रमास उपस्थित होते.