म्हसळा : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कुपोषण मुक्तीसाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत. मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही म्हसळा तालुक्यात सद्यस्थितीत 118 अंगणवाड्यांतून कमी वजनाची (मॅम) 26, तर तीव्र कमी वजनाचे (सॅम) एक अशी एकूण 27 बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकली असल्याचे उघड झाले आहे.
राज्यात 2022पर्यंत कुपोषण निर्मूलन, बाल व माता मृत्यू कमी करणे, या सर्वावर एकत्रित लक्ष प्राप्तीसाठी ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या एकत्रित अभिसरणाच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनाची मोहीम राबविली जात आहे.
अंगणवाड्यांत बालकांना शिक्षणाबरोबरच आहारही दिला जातो. तसेच बालकांची वजने घेऊन बालक कुपोषणाच्या कोणत्या पातळीत आहे याची माहिती सतत ऑनलाइन नोंदवली जाते. वयाच्या प्रमाणात उंची आणि वजन नसणार्या बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येते. किशोरी, गरोदर व स्तनदा मातांचे पोषण व आरोग्याबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.