
मुरुड : प्रतिनिधी
जिल्हा नगरोत्थान विकास योजनेंतर्गत मुरुड नगर परिषदेस मिळालेल्या 20 लाखांच्या निधीतून शहरातील पाण्याची टाकी ते दत्तमंदिर रस्त्याचे काम करण्यात येत आहे, मात्र या कामाची सुरुवातच निकृष्ट
दर्जाने झाल्याने येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
डांबराचा वापर कमी असल्याने टाकी ते दत्तमंदिर या रस्त्यावर टाकलेली खडी मूळ रस्त्याला चिकटली नाही. सर्व खडी सुटसुटीतच राहिली आहे. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी क्षेत्रपाल येथे जाताना अनेक भाविकांच्या दुचाकी घसरल्या, तर काही जण खाली पडले. या भाविकांनीसुद्धा रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल संताप व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्य्क अभियंता निलेश खिल्लारे यांना या रस्त्याचे फोटो दाखवले असता त्यांनी सांगितले की, पुरेसे डांबर न वापरल्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम बरेच दिवस बंद आहे. सदरचा रस्ता पुन्हा नव्याने तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.