Breaking News

बुमराहसाठी बीसीसीआयच्या नियमात बदल

गांगुलीचा मोठा निर्णय!

मुंबई : प्रतिनिधी

सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर गुजरात विरुद्ध केरळ यांच्यातील रणजी स्पर्धेतील सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते. याचे कारण म्हणजे भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार होता, पण अखेरच्या क्षणी बुमराह या सामन्यातून बाहेर पडला.

चार महिन्यांपूर्वी दुखापत झालेल्या बुमराहची श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. लंकेविरुद्ध 5 जानेवारी रोजी होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्याआधी बुमराहला रणजी सामना खेळण्यास सांगण्यात आले होते, पण बुमराहला स्वत:ला अधिक गोलंदाजी करायची नव्हती. यासंदर्भात त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला सांगितले होते. त्यानंतर गांगुलीने बुमराहसाठी नियमात बदल करीत विश्रांती घेण्याची परवानगी दिली.

केरळविरुद्धच्या रणजी सामन्यात जसप्रीतला खेळायचे होते, पण चार महिन्यांनंतर मैदानात पुनरागमन करणार्‍या जसप्रीतला शरीरावर अधिक भार टाकायचा नव्हता. यामुळेच बुमराहने गांगुलीसोबत चर्चा केली. त्यानंतर गांगुलीने बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी बोलून जसप्रीतला केवळ पांढर्‍या चेंडूवर खेळण्याचा सल्ला दिला.

बुमराहसाठी गांगुलीने नियमात बदल केल्यामुळे आता तो थेट श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेत खेळेल. बीसीसीआयच्या नियमानुसार कोणताही गोलंदाज दुखापतीनंतर जेव्हा पुन्हा मैदानात पुनरागमन करतो तेव्हा त्याला फिटनेस सिद्ध करावा लागतो. फिटनेस सिद्ध केल्यानंतरच तो भारतीय संघाचा भाग होऊ शकतो, पण गांगुलीने बुमराहसाठी हा नियम बाजूला ठेवत थेट आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची परवानगी दिली.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply