Breaking News

पोलिसांकडून 175 रिक्षा जप्त; वाशी टोलनाक्यावर टाळेबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी

पनवेल : बातमीदार

नवी मुंबईत कठोर टाळेबंदी सुरू केली आहे. मुंबईतून अत्यावश्यकसेवेव्यतिरीक्त अन्य कोणालाही शहरात येऊ दिले जात नाही. याच कारवाई दरम्यान 175 हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व रिक्षा नवी मुंबईतील टाळेबंदी संपल्यावर परत देण्यात येणार आहेत. वाशी टोल नाक्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबईत 3 ते 13 जुलै अशी 10 दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. टाळेबंदीत यापूर्वी असलेल्या टाळेबंदीप्रमाणेच नियम करण्यात आले, मात्र पहिले दोन दिवस ही टाळेबंदी नागरिकांनी गांभीर्याने न घेतल्याने अखेर पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यात मुंबईतून ये-जा करणारे अनेक नोकरदार आहेत. त्यात वाशी  ते मानखुर्द दरम्यान मोठ्या प्रमाणात शेअर रिक्षा चालतात. मात्र कोरोनामुळे  बसमध्ये मर्यादित प्रवासी असल्याने अनेक प्रवाशांना बस मिळत नसल्याने रिक्षाचा धंदा तेजीत आहे.

वाहतूक विभागाची कारवाई नवी मुंबईत टाळेबंदी असूनही या रिक्षा बिनदिक्कत व्यवसाय करीत असल्याचे लक्षात आल्यावर वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर यांनी कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 175 पेक्षा अधिक रिक्षा-टॅक्सी जप्त करण्यात आल्या. टाळेबंदी संपुष्टात आल्यानंतर जप्त रिक्षा चालकांना परत केल्या जातील, असे वाहतूक पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply