यवतमाळ : प्रतिनिधी
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कोणती शिक्षा दिली जाईल आणि शिक्षा कशी, कुठे, केव्हा दिली जाईल, हे आमचे जवानच ठरवतील, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना धैर्य तसेच आपल्या जवानांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे
बोलत होते. महाराष्ट्र दौर्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी (दि. 16) अजनी-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी त्यांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा पुनरुच्चार केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश असून, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी संघटनांनी जो गुन्हा केला आहे तो विचारात घेता त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी दहशतवाद्यांना शिक्षा नक्कीच होईल. मला आपल्या देशाच्या सैनिकांबाबत फक्त अभिमानच नाही तर विश्वासही आहे. दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची भारतीय सुरक्षा दलांना पूर्णपणे सूट देण्यात आल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांनीही देशाची सेवा करीत असताना पुलवामा येथे आपल्या प्राणांची आहुती दिली, असे म्हणत पंतप्रधानांनी या शहिदांना नमन केले. ज्या कुटुंबांनी आपले पुत्र गमावले आहेत, त्यांचे दु:ख मी अनुभवत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
— दहशतवादाचे दुसरे नाव पाकिस्तान
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानात दहशतवादाला आश्रय दिला जातो. फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या या देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. पाकिस्तान हे दहशतवादाचे दुसरे नाव आहे, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला सुनावले.
![](http://ramprahar.com/wp-content/uploads/2019/02/01.jpg)