नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असो किंवा देशाच्या सीमांवरील आव्हाने असोत; भारत संकटांशी लढा देण्यास नेहमी सज्ज असतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांना या वेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते.
भारतीय संविधानात नागरिकांची कर्तव्ये सांगितलेली आहेत आणि ती पार पाडणे सर्वांचीच जबाबदारी आहे. भारताने कोरोना लसनिर्मिती केली आहे, तसेच भारतीय सैन्याचे आधुनिकीकरणही केले जात आहे. देशाला आणखीन राफेल विमाने मिळाली आहेत. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हवेतच इंधन भरता येऊ शकते. भारतीय सैन्याच्या सर्व गरजा आता देशातच पूर्ण केल्या जात आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ज्या देशात सामाजिक शिस्त असते, तो देश प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असतो. सर्व युवावर्गाने आपणा सर्वांकडून व समाजातील अन्य घटकांकडून शिस्तीचा धडा गिरवला पाहिजे. एनसीसीचे कॅडर मदतीसाठी सदैव तत्पर असतात. कोणतेही संकट असो, ते सामान्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावतात. एकेकाळी आपल्याकडे नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते, मात्र जनजागृती वाढवल्यामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
एनसीसीच्या कॅडरमध्ये महिलांचे प्रमाण 35 टक्क्यांनी वाढले. संरक्षण दलात महिलांसाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शत्रूशी दोन हात करण्यासाठी देशाची वीरांगणा सज्ज आहे. आपल्या शौर्याची देशाला गरज आहे आणि नवीन यशोशिखरे आपली वाट पाहत आहेत, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी व्यक्त केला.
Check Also
अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. …
RamPrahar – The Panvel Daily Paper