पेण ः प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा 100 कोटी रुपये वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने असे आरोप करणे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात, जनमानसात राज्य सरकारची बदनामी सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पेण तालुका व शहर भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. पेण पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे यांच्याकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, महिला मोर्चा अध्यक्ष सुप्रिया चव्हाण, कणे सरपंच कुणाल पाटील, हरेश खंडागळे, किसन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मागील दीड वर्षात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, मनसुख हिरेन प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर हिरेन कुटुंबीयांनी केलेले आरोप, पूजा चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू अशा अनेक घटनांमुळे महाराष्ट्र सरकारची बदनामी झाली आहे. परिणामी राज्याच्या गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.