ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शेकडो एकर शेती बचावली
पेण : प्रतिनिधी
जागतीक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले येथील 17 किलोमीटरच्या बंधार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र दोन दिवसांच्या उधाणाचा फटका या योजनेच्या कामाला बसला असून या योजनेतील बहिराम कोटक गावाजवळच्या बाह्यकाट्याला सकाळी नऊच्या सुमारास खांड गेली. मात्र ग्रामस्थ अमरचंद पाटील, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील यांच्या समयसूचकतेने बाह्यकाट्याला गेलेल्या खांडीवर योग्यप्रकारे उपाययोजना झाल्याने बहिराम कोटक गावाचा मोठा धोका टळला.
बहिराम कोटक ग्रामस्थ चंद्रकांत पाटील यांच्या घराच्या बाजूने असलेल्या खार बांधाला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धूप सुरू होऊन या बाह्यकाट्याच्या शेजारी असलेले कांदळवन खाडीत वाहत गेले. त्यासोबत बाह्यकाट्याची मातीदेखील वाहू लागली.
ग्रामस्थ अमरचंद पाटील, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील यांनी समयसूचकता दाखवून त्याची माहिती ठेकेदाराला दिली. मात्र त्याची माणसेसुध्दा वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकली नाहीत. दरम्यान, ठेकेदाराचे अधिकारी श्री. गवारे यांनी अडथळा दूर करुन यंत्रसामुग्री घटनास्थळी पोचविली. त्यानंतर तीन यंत्रांच्या सहाय्याने युध्दपातळीवर बांध बांधण्यात यश आल्याने गावाचा धोका टळला.
RamPrahar – The Panvel Daily Paper