खोपोली : प्रतिनिधी
परिसरातल्या जंगलातून मिळणार्या रानमेव्याने आदिवासी समाजाला रोजगार मिळवून दिला आहे. खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव जंगलातील झाडावरून गोळा केलेला रानमेवा नजीकच्या बाजारात विकतात. त्यातून मिळालेल्या पैशातून आदिवासी बांधव सध्या संसाराचा गाडा चालवित आहेत. एप्रिल-मे या महिन्यात करवंदे, जांभूळ, चिंच, चिकू, काजू, जांब, आवळे, बोरे, आंबे आदी फळे झाडावर येतात. ही फळे आरोग्यासाठी चविष्ट आणि गुणकारी असल्याने लोक आवर्जून विकत घेतात. पावसाळा सुरू होईपर्यंत आंब्याला खूप मागणी असते. खोपोली बाजारपेठेतील हनुमान मंदिर परिसर सध्या आंब्यांची बाजारपेठ झाली आहे. तेथे सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आंबे खरेदीसाठी खालापूरसह शेजारच्या तालुक्यांतील लोक गर्दी करीत आहेत. गावठी आंब्याबरोबर कर्नाटकच्या आंब्याला जोरदार मागणी आहे. आंब्यांबरोबरच इतर रानमेवा सध्या आदिवासींना रोजगार मिळवून देत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper