नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताच्या विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीने ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करीत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकाविला. याआधी नेत्रा कुमानन हिने लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते. भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाआधी विष्णू तिसर्या क्रमांकावर होता, मात्र गुरुवारी त्याने थायलंडच्या किराती बुआलाँग याचा पराभव करीत एकूण दुसरे स्थान पटकावत टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. त्यानंतर चेंगाप्पा आणि ठक्कर या डोडीने 49 ईआर क्लास प्रकारात गुणतालिकेत सर्वोत्तम स्थान पटकावत ऑलिम्पिकचे स्थान प्राप्त केले. या दोघांनी इंडोनेशिया येथे झालेल्या 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
‘नौकानयनपटू, पालक आणि प्रशिक्षकांनी इतक्या वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले,’ असे भारताचे प्रशिक्षक टोमास्झ जानूझेवस्की यांनी म्हटले आहे.
नेत्री कुमानन, विष्णू सारावानन तसेच केसी गणपती आणि वरुण ठक्कर या चौघांचेही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याबद्दल अभिनंदन. भारताचे खेळाडू सर्व क्रीडाप्रकारात चमकत आहेत.
-किरेन रिजिजू, केंद्रीय क्रीडामंत्री