Breaking News

चला, वसुंधरेचे आपण सारे विश्वस्त होऊ या…

आपल्या विकासाच्या आणि सौंदर्याच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत. आज आपल्या डोळ्यांना सुंदर दिसणारं, वास्तविक पृथ्वीच्या आणि आपल्या येणार्‍या पिढ्यांच्या जीवावर उठणारं आहे, हे कुणी समजूनच घ्यायला तयार नाही. वसुंधरा दिनानिमित्ताने पृथ्वी आणि पर्यावरणावरील संकटांचा घेतलेला हा मागोवा…

आपण दर वर्षी वसुंधरा दिन साजरा करतो. वसुंधरेचे रक्षण करण्याच्या आणाभाका घेतो, वृक्षारोपण करतो, सेल्फी काढतो आणि दुसर्‍या दिवशी आपापल्या कामाला लागतो. दिवस सरला की वसुंधरेचे, पर्यावरणाचे महत्त्व सरते. ती आपल्याला आठवते, थेट पुढल्या वर्षी. मधले 364 दिवस आपण वसुंधरेचे मनसोक्त शोषण करतो. आपल्या संस्कृतीत वसुंधरेला माता म्हटले आहे. तिची पूजा केली जाते, पण ही संस्कृती आज केवळ पुस्तकांत आहे किंवा समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करण्यापुरती उरली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात कुणालाही वसुंधरेशी किंवा पर्यावरणाशी काही घेणे देणे नाही. विकासाच्या नावाखाली मानवाने सुंदर वसुंधरा अगदी विद्रूप करून ठेवली आहे.

आपल्या विकासाच्या कल्पनेत फक्त आणि फक्त आपण केंद्रस्थानी आहोत. जे करायचं ते फक्त माणसाचं आयुष्य सुकर होण्यासाठी. मग भलेही निसर्ग, इतर जीव जंतू, झाडे, पशू, पक्षी आणि ही वसुंधरा नष्ट झाली तरी चालेल. क्षणिक फायद्यासाठी आपण दूरगामी नुकसान करून घेत आहोत, याची कुणाला जराही जाणीव नाही. आज आम्हाला टोलेजंग इमारती हव्यात, मोठमोठे महामार्ग हवेत, बुलेट ट्रेन आणि मेट्रो हवी आणि हे करताना निसर्गाची नि पृथ्वीची कितीही हानी झाली तरी बेहत्तर!

आपल्या विकासाच्या आणि सौंदर्याच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत. आज आपल्या डोळ्यांना सुंदर दिसणारं, वास्तविक पृथ्वीच्या आणि आपल्या येणार्‍या पिढ्यांच्या जीवावर उठणारं आहे, हे कुणी समजूनच घ्यायला तयार नाही. आज विकासाच्या नावाखाली भरमसाठ वृक्षतोड सुरू आहे. सगळीकडे सिमेंट काँक्रीटचं जंगल उभं राहत आहे. गेली अनेक वर्षे विकासाच्या बिनडोक कल्पना राबवून आपण परिस्थिती इतकी वाईट करून ठेवली आहे की येत्या काही वर्षात पृथ्वीवर जीवन तग धरू शकणार नाही. मानवाच्या हव्यासापोटी आज हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित करून ठेवलं आहे. वारेमाप वृक्षतोड करून जलस्रोत संपवले आहेत. आता जेमतेम एप्रिल सुरू झाला आहे, अजून मे बाकी आहे. आताच जर तापमान इतकं वाढणार असेल, तर पुढे विचारायलाच नको. पुढच्या वर्षी काय होईल ह्या विचारांनीच अंगावर काटा येतो. जानेवारी-फेब्रुवारीत दुष्काळ. विहिरी, नद्या, तलाव आटून जातात. पाण्यासाठी वणवण. शहरात पाणी कपात. मग आणखी खोल बोअर घ्या. जिकडे बघावं तिकडे नुसता रखरखाट. फक्त इमारती. नजर जाईल तिथपर्यंत काँक्रीटच. औषधालाही झाडं नाहीत. फेब्रुवारी-एप्रिलमध्येच राज्यातला पाणीसाठा जवळ जवळ संपला आहे.

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली विदेशी झाडे लावून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. मादागास्कर येथून आलेला गुलमोहर, ऑस्ट्रेलियातून आलेला निलगिरी, सत्तरच्या दशकात आयात केलेल्या गव्हासोबत आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री ह्या झाडांनी आपली हजारो एकर जमीन नापीक केली आहे. ही विदेशी झाडे आणि ज्याला आपण गाजर गवत म्हणतो, ते तण आज आपल्या पर्यावरणासाठी एक फार मोठी समस्या बनले आहेत. मुंबई-ठाणे-नवी मुंबई-कल्याण-डोंबिवली भागात नव्या गृहनिर्माण संकुलात, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा हे झाडे लावलेली दिसतात. आपल्या जमिनीतील पाणी शोषून घेणे या व्यतिरिक्त ह्या झाडांचे काहीही योगदान नाही, पण आपल्या डोळ्यांना चांगलं दिसतं म्हणून केवळ ही झाडं लावली जातात. या झाडांमध्ये पक्ष्यांना आकर्षित करणारे देखील काही नाही. ह्या झाडांच्या बेसुमार वाढीमुळे आपल्या देशातील पक्ष्यांच्या संख्येवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. ठाण्यात माझ्या घराशेजारी एक गुलमोहराचे झाड आहे. त्यावर एके दिवशी टकठक ऐकू आली म्हणून उत्सुकतेने बघायला गेलो, तर एक कॉपर स्मिथ बार्बेट ढोली बनवताना दिसला. मला आश्चर्य वाटले. मी ते बघत होतो, काही वेळाने इंच-दोन इंच खोदकाम केल्यानंतर, तो उडून गेला आणि अजून परत आला नाही. तो खड्डा तसाच आहे.

आज विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा जो र्‍हास सुरू आहे, तो लवकरच आपल्या आणि वसुंधरेच्या मुळावर येणार आहे. मुंबईलगत, नवी मुंबईत हजारो हेक्टर पाणथळ जमीन भराव टाकून नष्ट करणात आली आहे. ह्यामुळे येथील जैवविविधता पूर्णपणे नष्ट झाली आहे. आपण पर्यावरणाशी संबंधित दिवस मोठ्या उत्साहात साजरे करतो, पण तेवढ्यापुरतेच. तो दिवस संपला की परत ये रे माझ्या मागल्या! हिवाळा संपून जेमतेम महिना-दीड महिना झाला नसेल तोच राज्यात हजारो गावांत पाणीटंचाई जाणवू लागली. सगळीकडे हाहाःकार माजला. मुंबईला पुरेसं पाणी मिळत नाही, पण आपण यातून काहीही शिकायला तयार नाही. राज्यात हजारो लोक पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करत आहेत आणि आपण आपल्या घराशेजारी असलेले पाण्याचे स्रोत नष्ट करत सुटलो आहोत.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीने, देशात ई-वेस्टची भयानक समस्या उभी केली आहे. ई-वेस्टचा पुनर्वापर करणे आणि विल्हेवाट लावणे, यामुळे देशाच्या बहुतांश भागात वायू, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण भयानक वाढले आहे. वायू प्रदूषणाची समस्या असलेल्या जगातील 10 पैकी नऊ शहरं भारतात आहेत. ई-वेस्टची अवैज्ञानिक पद्धतीने लावली जाणारी विल्हेवाट हे वाय-प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. देशात तयार होणार्‍या ई-वेस्टपैकी मोठ्या भागाचा पुनर्वापर होतो. त्यातील काही घटक काढून पुन्हा वापरले जातात किंवा विकले जातात. ह्या प्रक्रियेत हवेत धूळ आणि इतर कण सोडले जातात. यातील काही प्लॅस्टिक जाळले जाते, त्यामुळे हवेत अतिशय बारीक कण सोडले जातात, जे हजारो किलोमीटर उडत जातात. यामुळे पाणी तसेच जमिनीचेही प्रदूषण होते.

जमिनीवरील आणि भूगर्भातील जलप्रदूषणाचे मुख्य कारण आहे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी. देशात दररोज तयार होणारे सांडपाणी आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या सुविधा, यात बरीच तफावत आहे. जी काही प्रक्रिया केंद्र सध्या अस्तित्वात आहेत, ती देखील व्यवस्थित काम करत नाहीत, त्यांची योग्य ती देखभाल केली जात नाही. जी आहेत ती असून नसल्यासारखीच आहेत. देशात एकूण 300 पेक्षा जास्त नद्या प्रदूषित आहेत आणि त्यातील जवळपास 35 महाराष्ट्रात आहेत.

एकीकडे, वातावरण बदलामुळे निसर्गचक्र बिघडले आहे, तर दुसरीकडे, सरकार उरले सुरले पर्यावरण नष्ट करायला निघाले आहे. येत्या काळात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, पण सरकार आणि प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. पर्यावरणविरोधी निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे जणू. आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण काय देऊन जाणार, कुणास ठाऊक!

आपल्या आजूबाजूला पर्यावरणाचा दररोज असा नाश होत असताना, काही सामाजिक संस्था पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली पृथ्वी, जैवविविधतेचा आणि नैसर्गिक स्रोत वाचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. वर्षातून एक दिवस पृथ्वी आणि पर्यावरणाशी बांधिलकी दाखवून परिस्थती सुधारणार नाही. समाजाने आता सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरणे गरजेचे आहे. नवीन घर घेताना आपण सगळी कागदपत्रे हजारदा तपासतो, तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेतो. त्याचप्रमाणे, आता गृहसंकुलात सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे का, ते व्यवस्थित काम करत आहे का, प्रक्रिया न केलेले पाणी, नजीकच्या नाल्यात, नदीत, तलावात तर सोडले जात नाही ना, याची देखील खात्री करून घेणे गरजेचे आहे. जोवर जनतेचा दबाव येणार नाही, तोवर सरकार आणि प्रशासन बधणार नाही आणि प्रदूषण होतच राहील.

आपल्याला जे पर्यावरण, नैसर्गिक स्रोत मिळाले आहेत, ते मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करणे ही आपली जबाबदारी आहे आणि वसुंधरेचे विश्वस्त होऊन आपण ती पार पाडली पाहिजे, पण ह्याकडे कुणी लक्ष देताना दिसत नाही. जो तो नुसता शोषण करतो आहे. सगळंच्या सगळं आपणच ओरबडणार आहात का?

-अश्विन अघोर, पर्यावरणतज्ज्ञ

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply