पेण : प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून एक एतिहासिक पाऊल उचलले आहे, ही योजना गरीबांसाठी लाभदायी ठरत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण येथे केले.
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पेण नगरपालिकेच्या वतीने विमा पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपालिका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा प्रीतम पाटील बोलत होत्या. नगरपालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांनी या योजनेशी सलग्न असलेल्या शासकीय किंवा खासगी रूग्णालयात जाऊन दुर्धर आजारांवर उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थ्यांना पाच लाख रूपयांपर्यतचा विमा प्रति वर्षी दुर्धर आजारावरील उपचारासाठी मिळणार असून, देशातील सुमारे 10 कोटी कुंटूंबे म्हणजे 50 कोटी लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी यावेळी दिली. पेण नगरपालिका क्षेत्रातील 517 नागरिकांना आयुष्यमान भारत योजने अंतर्गत विमा सरंक्षण पत्राचे वाटप करण्यात आले.
पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरूद्ध पाटील, पाणी पुरवठा सभापती नलिनी पवार, महिला व बालकल्याण सभापती शहेनाज मुजावर, मागासवर्गीय समिती सभापती अश्विनी शहा, नगरसेविका वैशाली कडू, तेजस्विनी नेने, वसुधा पाटील, अर्पिता कुंभार, ममता लांगी, नगरसेवक शोमेर पेणकर, संतोष पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, माजी नगरसेविका धनश्री समेळ, मुख्याधिकारी अर्चना दिवे, आरोग्य विभागाचे अधिकारी दयानंद गावंड, अंकिता इसळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यालयीन अधिक्षक शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper