Breaking News

पूरस्थितीचे राजकारण करू नका : मुख्यमंत्री

सांगली : प्रतिनिधी

पूरस्थितीत कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले आहे. सांगलीतील पूरस्थिती, मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. 10) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच पूरग्रस्तांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी मदत आणि बचावकार्याचाही आढावा घेतला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.

मुसळधार पाऊस तसेच कोयना धरणातील विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण झाली. सांगली आणि कोल्हापूरमधील जनजीवन पूर्ववत करण्यावर सध्या सरकारने भर दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूरग्रस्तांना सरकारने दिलेल्या मदतीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला या वेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. पूरस्थितीवरून कुणीही राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रित येऊन लोकांना मदत करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या उणिवा विरोधकांनी दाखवाव्यात, पण राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. आपल्याला राजकारण करण्यासाठी बराच वेळ आहे. सध्या राजकारण करण्याची ही योग्य वेळ नव्हे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

अन्नधान्याच्या पाकिटावर कुणाचेच फोटो नकोत. मदत म्हणून दिलेल्या अन्नधान्याच्या पाकिटावर ’महाराष्ट्र शासन’ एवढाच उल्लेख असावा, अशा सूचना मी दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply